आला काळोख दाटूनी
काहूर विचारांचे घेऊनी
दिस नकळत सरला
रातीला एकटेपणा उरला
मन एकाकी एकाकी
गाठ पडे प्रश्नांची
या भयाण काळोखी
घालमेल होई जीवाची
मन गुंतती गुंतती
गुंतल्यात आठवणी
तारे ते बघूनी
डोळा येते मग पाणी
गेला तारा बनण्या
डाव अर्ध्यावर सोडून
थकले मी आता
रथ तुझ्याविना ओढून
लाखो तार्यांत त्या
तुला शोधायचे कुठे?
हितगुज तुझ्याशी
आता साधायचे कसे?
नको वाटते आता
रात एकाकी भकास
तुझ्याविना माझा
इथेच थांबावा प्रवास...
