Pages

Sunday, June 17, 2012

पाऊस आला की हे असं होतं

 
 
पाऊस आला की हे असं होतं
मनात दडून बसलेल्या
कोंडून ठेवलेल्या भावनांमध्ये
कुजबुज सुरु होते
कुजबुज वाढत जाते
आणि त्याचा गलका होतो
आणि मग मी
मनाची कवाड उधडतो
शब्द बाहेर येतात
कागदावर उतरतात
आणि त्याची कविता होते
“पावसाची कविता”
मी त्याला नाव देतो ..!!
 
 

पाऊस असा कोसळतो



पाऊस असा कोसळतो
एकांती जीव जळतो
रंग धुंद धुंद
गंध कुंद कुंद
एकांती जीव तडफडतो
तळमळतो , जळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

घन गडाड गड
वीज कडाड कड
गंधार नभी घुमतो
अंधार चिंब डसतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

तन चूर चूर
मन पूर पूर
विरह उरी चुभतो
शृंगार उगी पाहतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..

वाट पाही पाही
साथ नाही नाही
सरण हे रचतो
मरण रे मागतो
कोसळतो
पाऊस असा कोसळतो , एकांती जीव जळतो..